प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच आणि डोळ्यांत आसवं उभं करणारं ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे अजरामर गीत लिहिणारे रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा सहा फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... .......
सहा फेब्रुवारी १९१५ रोजी उज्जैनजवळ जन्मलेले रामचंद्र नारायण द्विवेदी हे अवघ्या भारतभर लोकप्रिय झाले ते कवी प्रदीप म्हणून! शाळकरी वयापासूनच ते कविता करत असत आणि त्यांनी कॉलेजवयात कविसंमेलनं गाजवायला सुरुवात केली होती.
१९३९ साली आलेल्या अशोककुमार आणि देविकाराणीच्या ‘कंगन’ सिनेमापासून त्यांची हिंदी चित्रपटांत गीतकार म्हणून कारकीर्द सुरू झाली. पुढच्याच ‘बंधन’ सिनेमातल्या ‘
चल चल रे नौजवान’ गाण्याने त्यांना नाव मिळालं; पण त्यांनी खऱ्या अर्थाने भारतभर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला तो ब्रिटिशांच्या राजवटीत ‘चले जाव’ चळवळीच्या पार्श्वभूमीवर १९४३ साली प्रसिद्ध झालेल्या, ‘किस्मत’ सिनेमातल्या ‘
आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दूर हटो ऐ दुनियावालो हिंदोस्ताँ हमारा है’ या जबरदस्त गाण्याने! त्या काळी सिनेमागृहात हे गाणं सुरू झालं की प्रेक्षक बेभान होत असत. जागेवर उठून उभे राहात. काही ठिकाणी तर हे गाणं ‘वन्स मोअर’ घेऊन पुन्हा लावावं लागे! ब्रिटिशांच्या सेन्सॉरशिपमधून सुटण्यासाठी प्रदीप यांनी एका ओळीत चलाखीने ‘शुरू हुआ है जंग तुम्हारा जाग उठो हिंदुस्तानी, फिर न किसी के आगे झुकना जर्मन हो या जापानी’ असं ब्रिटिशांऐवजी जर्मन, जपानी म्हटलं होतं; पण ते कळायचं त्या भारतीयांना कळलंच! हा ‘किस्मत’ सिनेमा कोलकात्याच्या थिएटरमध्ये लागोपाठ २०० आठवडे चालला होता त्या काळी!!
११ डिसेंबर १९९८ रोजी त्यांचं मुंबईत विलेपार्ले येथे निधन झालं.